राष्ट्रीय

३७० जागा जिंकणे हीच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली; राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रतिपादन

पक्ष सदस्यांना गरीबांसाठी कार्य करण्याचे तसेच देशाचा विकास आणि जागतिक स्तरावर वाढलेली स्थिती याभोवती पक्षाची लोकसभा निवडणुकीची मोहीम तयार करण्यासही सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकणे हीच पक्ष विचारसरणीचे प्रमुख विचारवंत दिवंगत श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले. पक्षाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आयोजित भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी पक्ष सदस्यांना गरीबांसाठी कार्य करण्याचे तसेच देशाचा विकास आणि जागतिक स्तरावर वाढलेली स्थिती याभोवती पक्षाची लोकसभा निवडणुकीची मोहीम तयार करण्यासही सांगितले. मुखर्जी हे जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणाऱ्या कलम ३७० चे कट्टर विरोधक होते. मोदी सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केले.

या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, प्रत्येक बुथ कार्यकर्त्याने आता मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आगामी निवडणुकीत २०१९ च्या तुलनेत प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाला किमान ३७० अधिक मते मिळतील याची खात्री करावी.

मोदींच्या भाषणाबाबत पत्रकारांना अधिक माहिती देताना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले की, निवडणुकीदरम्यान विरोधक अनावश्यक आणि भावनिक मुद्दे उपस्थित करतील, परंतु पक्षाच्या सदस्यांनी विकास, गरीबांसाठीची धोरणे आणि देशाची जागतिक स्तरावर असणारी स्थिती यावर लक्ष केंद्रित करावे. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षातर्फे २५ फेब्रुवारीपासून मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. मोदींनी नमूद केले की, ते १२ वर्षांहून अधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि सुमारे २३ वर्षे तेथे सरकारचे प्रमुख आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही. त्यांचा कालखंड हा आरोपमुक्त आणि विकासयुक्त असल्याचा दावाही तावडे यांनी मोदी यांच्या संबंधात केला.

Thane : झेडपीच्या शाळांकडे पालकांचा ओढा; इयत्ता पहिलीत ८ हजार २८० विद्यार्थ्यांचा प्रवेश

कोस्टल रोड प्रकल्पातील बोगदा 'फायर प्रूफ'; 'वॉटर मिस्ट टर्बाइन' वाहन तैनात करणार; BMC करणार ६ कोटी ३२ लाख रुपये खर्च

भिवंडीत फेमस शोरमा हॉटेलवर बुलडोझर; अन्न विषबाधाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ वर; महापालिकेने केली कारवाई

मंच्युरियनमध्ये आढळले पालीचे पिल्लू; उल्हासनगरातील तरुणीची प्रकृती बिघडली

लाडकी बहीणनंतर शिवसेनेचे लाडकी सून अभियान; राज्य प्रमुखपदी मीनाक्षी शिंदे, महिलांच्या न्यायासाठी उभारणार सक्षम यंत्रणा