नवी मुंबई

आई-वडील शिकायला पाठवत नसल्याने पाच मुलींनी गाठली दिल्ली

आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळून तसेच घरातील वातावरण ठीक नसल्याने तळोजा भागात राहणाऱ्या ५ ते १६ वयोगटातील ५ मुली स्वत:हून घर सोडून निघून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळून तसेच घरातील वातावरण ठीक नसल्याने तळोजा भागात राहणाऱ्या ५ ते १६ वयोगटातील ५ मुली स्वत:हून घर सोडून निघून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या मुलींचा शोध घेऊन त्यांना दिल्लीतील गुडगाव येथून ताब्यात घेतल्यानंतर या पाचही मुलींचे अपहरण झाले नसल्याचे उघडकीस आले. या पाचही मुलींना पुढील कार्यवाहीसाठी तळोजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

घरातील वातावरण ठीक नसल्यामुळे पाचही मुलींनी दिल्लीतील गुडगांव येथे राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीच्या मानलेला भावाकडे आश्रय मिळविला. दरम्यान, तळोजा परिसरातून ५ ते १६ वयोगटातील ५ मुली एका वेळेस गायब झाल्याने त्यांच्या पालकांनी सगळीकडे शोधा शोध करून तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, गुन्हे शाखा युनिट-२ उमेश गवळी, युनिट-३ चे पोलीस निरीक्षक मुलाणी तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली.

या गुन्ह्यातील अपह्रत झालेल्या पाचही मुलींपैकी यातील १६ वर्षीय मुलगी, दिल्लीतील गुडगांव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान, पाचही मुली एकत्र असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी अपह्रत मुलीपैकी १४ वर्षीय मुलीचा मानलेला भाऊ आरिफ याला संपर्क साधून पाचही अपहृत मुलींना दिल्ली गुडगाव येथून सुखरूप ताब्यात घेतले.

संगनमताने पाचही जणींनी सोडले घर

या प्रकरणातील १४ वर्षीय मुलीला तिचे आई-वडील शाळा शिकू देत नव्हते, ते तिला जबरदस्तीने भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यास भाग पाडून तिला मारहाण करत होते. तसेच तिच्या दोन लहान बहिणींना सुद्धा शिकण्याची आवड असताना त्यांना देखील ते शाळेत पाठवत नव्हते. त्यामुळे १४ वर्षीय मुलीने मागील १ महिन्यापासून घर सोडून जाण्याची तयारी केली होती. त्यासाठी तिने पैसे जमवून ठेवले होते. तिला एकूण सात बहिणी असून त्यापैकी ७ व ५ वर्षीय या दोन लहान बहिणींना घेऊन ती घरातून बाहेर पडली. त्यावेळी रस्त्यामध्ये या तिघी बहिणींना त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या १६ व १४ वयोगटातील दोघी बहिणी भेटल्या. त्यानंतर त्या पाचही जणींनी संगनमताने घर सोडून जाण्याचे ठरवले.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया