नवी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; मुख्यमंत्र्यांचे सर्वपक्षीय समितीला आश्वासन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला काही दिवस उरले असतानाही स्व. दि. बा. पाटील यांच्या नावाने नामकरणाची मागणी कायम आहे. स्थानिकांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक झाली.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन फक्त चार दिवसांवर आले असताना, स्थानिक समाजाचा स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या नावावर विमानतळ नामकरणासाठीचा संघर्ष अजूनही सुरू आहे. स्थानिक समाजाने उग्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नामकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत पुन्हा एकदा स्वर्गीय दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दि. बा. पाटील हे सिडको क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना हक्क मिळवून देण्यात यशस्वी लढा देणारे नेते होते. पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरातील नागरिकांनी अनेक वर्षे या नावासाठी संघर्ष केला. ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार असताना अद्याप दि. बा. पाटील यांचे नाव अंतर्भूत न झाल्याने स्थानिकांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली होती.

बैठकीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार सुरेश म्हात्रे, आ. मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, माजी आमदार राजू पाटील, सुभाष भोईर, भूषण पाटील, महेंद्र घरत, सुरेश पाटील, जे. डी. तांडेल यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या आश्वासनामुळे आंदोलनाची शक्यता कमी झाली असून, दि. बा. पाटील यांच्या नावाचे विमानतळ नामकरण लवकरच होईल, असे अपेक्षित आहे.

दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक

मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान सांगितले की, केंद्र सरकारने नामकरणाच्या निकषात सुधारणा केली असून नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील तीन विमानतळांच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे त्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे.

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल