नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळावरून होणाऱ्या सेवांचा उद्यापासून मोठा विस्तार होत आहे. रविवार २९ मार्चपासून हा विमानतळ देशातील आणखी ३० शहरांना जोडला जाणार आहे. या नव्या शहरांमध्ये देशातील श्रीनगर, जम्मू, तिरुपती, तिरुवनंतपुरम, दाभोळी(गोवा) तसेच राज्यातील कोल्हापूर इत्यादींचा समावेश आहे.
गेल्या वर्षी या विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर सोळा शहरांसाठी विमानसेवा सुरू झाल्या होत्या. सर्व सेवा दिवसाच्या होत्या. उद्यापासून आणखी तीस शहरे जोडली जाणार असल्याने एकूण ४६ शहरांसाठी नवी मुंबईतून विमाने सुटणार आहेत. उन्हाळी सुट्टीसाठी २९ मार्च ते २४ ऑक्टोबर या कालावधीसाठीचे पहिले वेळापत्रक जाहीर झाले. गुरूवारी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) कंपनीने याबाबत एका पत्रकाद्वारे अधिकृत घोषणा केली.
दरम्यान, या विमानतळावरून व्यापारी, पर्यटन तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांकडे उड्डाणांची संख्या लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली आहे. यात विशेषतः दिल्ली (दररोज ९ उड्डाणे), गोवा (७), बंगळुरू (६) आणि कोची (५) या शहरांकडे सर्वाधिक उड्डाणे नियोजित आहेत. याशिवाय हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूर या शहरांनाही नियमित हवाई सेवा मिळणार आहे. या उन्हाळी वेळापत्रकात इंडिगो, आकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या तीन विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे चालविणार असून, त्यामुळे प्रवाशांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. नव्या वेळापत्रकामुळे या विमानतळावरून दिवसाला सरासरी १५६ तर आठवड्याला सुमारे १,०९२ उड्डाणे होऊ लागतील. प्रारंभी सुरूवातीला दररोज २२ उड्डाणे असताना एप्रिल महिन्यापर्यंत ती वाढून ७८ उड्डाणांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.
या विस्तारामुळे टियर-१ आणि टियर-२ शहरांमधील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः पर्यटन, व्यावसायिक प्रवास आणि धार्मिक स्थळांना जाणाऱ्या प्रवाशांना थेट उड्डाणे वाढणार आहेत. यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताणही काही प्रमाणात कमी होईल. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळावरून दरवर्षी सुमारे नऊ कोटी प्रवासी ये-जा करू शकतील अशी अपेक्षा आहे.
नवी मुंबई विमानतळावरून आता या ३० शहरांमध्ये थेट सेवा सुरू होणार आहेत...
आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, गोवा (डाबोळीम), गोरखपूर, हिंडन, राजकोट (हिरासर), हुबळी, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपुरम आणि विशाखापट्टणम.