नवी मुंबई : कल्याण येथून पंढरपूरकडे निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे येथे झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते.
रात्री साडेनऊच्या सुमारास बस ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे येथे पोहोचली असताना, भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती उलटून रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर चालक संभाजी मानेने कोणत्याही प्रकारची मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच तुर्भे पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांमध्ये स्मिता चौधरी (३५), वैजयंता साबळे (६२), सुजाता कांबळे (४०) आणि रघुनाथ सोनवले (५७) या चौघांचा समावेश असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत बसचालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.