नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील ५२७ पोलीस शिपाई पदांसाठी तब्बल ५०,४६० उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले असून या भरती प्रक्रियेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येत्या ११ फेब्रुवारीपासून कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. या चाचणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच पुढील १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी संधी मिळणार आहे. वाढती लोकसंख्या तसेच नव्याने सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस दलाची क्षमता वाढवणे गरजेचे झाले असून ही भरती प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
शासनाने गत नोव्हेंबर महिन्यात पोलीस शिपाई ४३९, पोलीस शिपाई चालक ८२ आणि पोलीस बँडसमन ६ अशा एकूण ५२७ पदांसाठी अर्ज मागवले होते. पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांचे १२,२८४, महिला ३,०३१, माजी सैनिक २०९ आणि तृतीयपंथी १ असे एकूण १५,५२५ अर्ज प्राप्त झाले. पोलीस बँडसमनच्या ६ पदांसाठी पुरुष ५७३, महिला १४४ आणि माजी सैनिक ३ असे एकूण ७२० अर्ज आले. तर चालक पोलीस शिपाईच्या ८२ पदांसाठी पुरुष २८,१५२, महिला ५,४३७ आणि माजी सैनिक ६२६ असे एकूण ३४,२१५ अर्ज दाखल झाले आहेत.
११ फेब्रुवारीपासून होणाऱ्या मैदानी चाचणीस ५० गुण असतील. शारीरिक निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी पात्रता मिळेल. भरतीसाठी येणाऱ्या हजारो उमेदवारांच्या सोयीसाठी कळंबोली येथे विशेष व्यवस्था करण्यात आली असून सामाजिक संस्थांच्या मदतीने राहण्याची व जेवणाची सोय केली जाणार आहे. मैदानावर वैद्यकीय कक्ष तैनात ठेवण्यात येणार असून पनवेल महानगरपालिकेकडून स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने राबवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.