नवी मुंबई : उरण तालुक्यातील जासई गावातील मोठ्या तलावात पाण्यात खेळत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीन चिमुरड्या मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण उरण परिसरावर शोककळा पसरली आहे.
मृत मुलींमध्ये रेहानाखातून रमजानअली (८), रवीना परवीन रमजानअली (७) आणि सौम्या कन्हैया कुमार (१२) यांचा समावेश आहे. तिन्ही मुली जासई गावातील मोठ्या तलावाजवळील परिसरात शेजारी राहत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तिन्ही मुली तलावाच्या काठावर पाण्यात खेळत होत्या. खेळता खेळता त्या खोल पाण्यात गेल्या. पाण्याची खोली लक्षात न आल्याने तिन्ही मुली बुडाल्या. हा प्रकार तलावाजवळील काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलींना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघींनाही मृत घोषित केले.
या दुर्घटनेतील रेहानाखातून आणि रवीना परवीन या सख्ख्या बहिणी असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे कुटुंब मूळचे भगवानपूर, जिल्हा वैशाली (बिहार) येथील असून सध्या जासई येथील इस्माईल शेख यांच्या चाळीत भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जासई गावासह परिसरातील कामगार वस्तीत शोककळा पसरली आहे. दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या मैत्रिणीचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.