दक्षिण मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर (WTC) आणि नवी मुंबई दरम्यान धावणाऱ्या काही एनएमएमटी एसी बसेस अचानक रद्द झाल्यामुळे बुधवारी सकाळी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
पनवेल, खारघर आणि नेरूळ येथील थांब्यांवर प्रचंड उन्हात दीर्घ वेळ वाट पाहिल्यानंतर,अनेक प्रवाशांना त्यांच्याच मार्गावरील तीन बसेस रद्द झाल्याची माहिती प्राप्त झाली. १६ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलेल्या बसेस या पुढीलप्रमाणे होत्या: ११०/१ - जी सकाळी ७:१० वाजता खारघर सेक्टर-३५ येथून निघते, १०६/१ - सकाळी ७:२० वाजता पनवेलहून सुटते आणि १०८/२ - सकाळी ८:०० वाजता नेरूळ सेक्टर-४६ येथून रवाना होते.
या बदलाची कोणतीही अधिकृत पूर्वसूचना न मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. त्याचबरोबर कामावर जाण्याची वेळ असल्यामुळे प्रवाशांनी अखेर जवळच्या रेल्वे स्थानकांकडे धाव घेतली. या बदलामुळे नाराज झालेल्या नियमित प्रवाशांनी आता एक स्वाक्षरी मोहीम सुरू करून एनएमएमटी प्रशासनाकडे तीनही बसेस त्वरित पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.