उरण : नवी मुंबईतील एनआरआय तलावातील फ्लेमिंगोंच्या (रोहित पक्षी) मनमोहक थव्यांचे दर्शन घेण्यासाठी सध्या शेकडो पक्षीप्रेमी आणि पर्यटकांची अरुंद किनाऱ्यावर प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे या एकमेव अधिवासावर कमालीचा ताण येत असून, हा ताण कमी करण्यासाठी आणि शहरातील पक्षीनिरीक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी शेजारील 'डीपीएस' आणि 'टीएस चाणक्य' वेटलँड्सचे तातडीने पुनरुज्जीवन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे.
शेजारच्या शहरांमधूनही मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने सध्या एनआरआय तलाव क्षेत्र हे एक अनधिकृत पर्यावरण पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे, असे 'नॅटकनेक्ट फाऊंडेशन'ने सांगितले. स्थलांतरित पक्षी आणि निसर्गप्रेमी या दोघांच्याही हितासाठी तिन्ही वेटलँड्स पुनर्जीवित करावेत, असे आवाहन संस्थेने राज्य सरकारला केले.
फ्लेमिंगो पर्यावरण समतोल राखण्यात आघाडीवर
"एनआरआय वेटलँडच्या मर्यादित भागावर पक्ष्यांचे अवलंबित्व वाढल्याने तेथील सूक्ष्म अन्नस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पक्ष्यांसाठी पर्यायी खाद्यस्थळे उपलब्ध करून देणे गरजेचे असून डीपीएस आणि टीएस चाणक्य वेटलँड्सचे पुनरुज्जीवन अत्यावश्यक बनले आहे," असे रायगड जिल्हा वेटलँड दस्तावेजीकरण समितीच्या सदस्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. फ्लेमिंगो हे पर्यावरणीय समतोल राखण्यात त्यांची भूमिका मोठी असल्याचेही त्यांनी नमूद केले.