मुंबई : ३७ वर्षीय अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात रहाणे फक्त खेळाडू म्हणून मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे.
एकेकाळी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या रहाणेने २०२४मध्ये मुंबईला विक्रमी ४२व्यांदा रणजीचे जेतेपद मिळवून दिले. मात्र २०२५च्या हंगामातील अपयश, वाढते वय व भविष्याचा विचार करता रहाणेने आता नव्या कर्णधाराला घडवण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने मुंबईसाठी २०१ प्रथम श्रेणी सामन्यांत १४ हजार धावा केल्या असून यामध्ये ४१ शतकांचा समावेश आहे. यंदाच्या रणजी हंगामाला १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.
रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने २०२४च्या रणजी जेतेपदासह इराणी चषकही जिंकला. तसेच टी-२० व एकदिवसीय प्रकारात श्रेयस अय्यर मुंबईचे कर्णधारपद भूषवत असला, तरी रहाणे वरिष्ठ खेळाडू म्हणून छाप पाडत आहे. मुंबईने २०२४मध्ये मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. त्यामध्ये रहाणेनेच ४६९ धावा फटकावून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
२०२५च्या आयपीएलमध्ये रहाणे कोलकाताचा कर्णधार होता. मात्र फलंदाज व नेतृत्व या दोन्ही विभागांत तो फारशी छाप पाडू शकला नाही. रहाणे अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला नसून देशांतर्गत हंगामाच्या बळावर त्याला अद्यापही भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याची आशा आहे.
"मुंबईच्या संघाचे नेतृत्व करण्यासह जेतेपद मिळवणे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मात्र आगामी देशांतर्गत हंगाम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी नव्या नायकाला घडवण्यास हीच योग्य वेळ असल्याचे मला वाटते. त्यामुळे मी मुंबई संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. मात्र खेळाडू म्हणून यापुढेही मी तिन्ही प्रकारांत मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे." - अजिंक्य रहाणे