मुंबई : ३४ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अद्याप १०० टक्के तंदुरुस्त नाही, असे बीसीसीआयच्या वैद्यकीय विभागाने सोमवारी जाहीर केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी त्याचा भारतीय संघात समावेश केला जाणार नाही, हेदेखील स्पष्ट झाले. शमी सध्या विजय हजारे स्पर्धेत बंगाल संघाचा भाग असला तरी डाव्या पायाच्या गुडघ्याला सातत्याने सूज येत असल्याने तो अद्याप या स्पर्धेत एकही सामना खेळलेला नाही. ११ डिसेंबर रोजी मुश्ताक अली स्पर्धेत शमी अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर तो मैदानापासून दूरच आहे.
“शमीने रणजी स्पर्धेत मध्य प्रदेशविरुद्ध ४३ षटके गोलंदाजी केली. त्यानंतर मुश्ताक अली स्पर्धेत ९ सामन्यांत तो खेळला. मात्र दर दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यानंतर त्याच्या डाव्या गुडघ्याला सूज येत आहे. तसेच कसोटीसाठी आवश्यक असलेली तंदुरुस्ती मिळवण्यास त्याला आणखी काही काळ लागेल. त्यामुळे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) शमीवर बीसीसीआयचा वैद्यकीय चमू मेहनत घेत आहे,” असे बीसीसीआयने म्हटले.
शमी नोव्हेंबर २०२३मध्ये विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताकडूव अखेरची लढत खेळला. त्यानंतर गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे तो मैदानापासून दूर राहिला. रणजीतील एका सामन्याद्वारे त्याने पुनरागमन केले. तसेच मुश्ताक अली स्पर्धेनंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्याता यावा. जेणेकरून जसप्रीत बुमरावरील भार कमी होईल, अशी मागणी अनेक चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंनी केली होती. मात्र शमी तंदुरुस्त नसल्याने तो ऑस्ट्रेलियाला जाणार नाही, हे आता पक्के झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तो परतेल, अशी अपेक्षा आहे.