चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यापासून भारताचा संघ केवळ एक पाऊल दूर असून आजच्या (दि.४) सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अडथळा दूर केल्यास भारताचे अंतिम सामन्याचे स्थान निश्चित होणार आहे. तथापि, भारताने या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारल्यास पाकिस्तानलाही मोठा झटका बसणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे नववे पर्व संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. २०१७ नंतर प्रथमच म्हणजे आठ वर्षांनी आलेल्या या स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा पाकिस्तानला देण्यात आला. पण, भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार यावर आधीच सहमती झाली होती. भारत उपांत्य फेरीत न पोहोचल्यास स्पर्धा पुन्हा पाकिस्तानात शिफ्ट होणार होती. पण तसे काही झाले नाही. भारताने दुसऱ्या साखळी सामन्यात पाकिस्तानचाच पराभव करुन उपांत्य फेरीचे स्थान निश्चित केले. त्यामुळे आपसूकच उपांत्य फेरीचा सामना दुबईत होणार हे निश्चित झाले.
जर भारताने उपांत्य सामन्यात विजय मिळवल्यास अंतिम सामनाही दुबईतच रंगणार आहे. त्यामुळे असे झाल्यास तब्बल २९ वर्षांनी आयसीसी स्पर्धा आयोजनाचा मान मिळालेल्या पाकिस्तानची निराशा होणार आहे. कारण आयोजनाची संधी मिळालेल्या साखळी सामन्यांपैकीही तीन सामन्यांवर पावसाच्या व्यत्ययामुळे पाणी फेरलं गेलंय. अशात आता अंतिम सामन्यात भारत पोहोचल्यास केवळ एका उपांत्य फेरीच्या सामन्याच्या आयोजनावरच पाकिस्तानला समाधान मानावे लागणार आहे. यापूर्वी पाकिस्तानने १९९९ मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा आयोजित केली होती. त्यामुळे भारतऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यात जिंकल्यास तब्बल २९ वर्षांनी स्पर्धा आयोजनाची संधी मिळालेल्या पाकिस्तानला अंतिम सामन्याचाही मान मिळणार नाही आणि लाहोरमध्ये बसूनच सामना बघावा लागणार आहे.