भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
क्रीडा

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) चे अध्यक्ष कालिकेश नारायण सिंह देव यांनी ही माहिती दिली. गुरुवारी रात्री दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय नेमबाजी क्षेत्रातील दिग्गज नेमबाज आणि माजी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) चे अध्यक्ष कालिकेश नारायण सिंह देव यांनी ही माहिती दिली. गुरुवारी रात्री दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारतीय पिस्तूल नेमबाजांचे उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक (High-Performance Coach) म्हणून कार्यरत असलेले राणा नुकतेच जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेतून परतले होते. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले, मात्र त्यांची प्रकृती सुधारली नाही.

हृदयविकाराच्या समस्येनंतर निधन

म्युनिक येथे झालेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेतून परतताना जसपाल राणा यांची प्रकृती बिघडली होती. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाशी संबंधित समस्येमुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. सुरुवातीला प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पुढील काही दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर त्यांचे निधन झाले.

भारतीय नेमबाजीतील मोठं नाव

जसपाल राणा हे भारतातील सर्वात यशस्वी नेमबाजांपैकी एक मानले जात होते. आशियाई क्रीडा स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी देशासाठी पदके जिंकली होती.

खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली. २०१२ मध्ये त्यांची कनिष्ठ राष्ट्रीय पिस्तूल प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ चौधरी, अनीश भानवाला, चिंकी यादव आणि ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर यांसारख्या अनेक खेळाडूंनी मोठे यश मिळवले. युवा नेमबाजांना घडविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

फेब्रुवारी २०२५ मध्ये NRAI ने त्यांची २५ मीटर पिस्तूल प्रकारासाठी उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. भारतीय नेमबाजीतील योगदानासाठी केंद्र सरकारने २०२० मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले होते.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हे मोठे नुकसान असल्याचे म्हटले.

"जसपाल राणा यांचे निधन ही भारतीय क्रीडा विश्वासाठी मोठी हानी आहे. नेमबाज म्हणून त्यांनी देशाला गौरव मिळवून दिला. प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक युवा खेळाडूंना घडवले. त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील," असे मोदी यांनी म्हटले.

यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

मृतदेहाच्या गुप्तांगावरील विनोद भोवला! KEM ची डॉक्टर तरुणी अडचणीत; ३७० बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेच्या शोतील आणखी एक क्लिप व्हायरल

Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत

उकाडा, आर्द्रतेमुळे ठाणेकर हैराण; घामोळ्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ