

ठाणे : ठाणे शहराचे यंदाचे कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. त्यातच अधूनमधून पडणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि कायम असलेला उकाडा यामुळे घामोळ्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच ठाणेकरांना घामोळ्यांचा असह्य त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पावसाच्या एक-दोन सरी कोसळत असल्या तरी वातावरणातील उकाडा कमी झालेला नाही. उलट पाऊस पडल्यानंतर हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना अधिक घाम येत आहे. सध्या मान, पाठ, छाती, काखा आणि हातांवर लालसर पुरळ, खाज, जळजळ तसेच त्वचेची आग होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घामोळे ही सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. घामोळ्यांपासून बचावासाठी दिवसातून पुरेसे पाणी पिणे, ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत तसेच इतर द्रवपदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. शरीराला हवा खेळती राहील असे सुती व सैलसर कपडे परिधान करावेत. दिवसातून किमान दोन वेळा अंघोळ करून त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. अतिघट्ट कपडे घालणे टाळावे. तसेच दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सध्या वाढलेल्या दमटपणामुळे घामोळे, डिहायड्रेशन आणि त्वचेच्या संसर्गाच्या तक्रारी वाढत आहेत. नागरिकांनी भरपूर पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे संतुलन राखावे. घामोळ्यांमुळे आलेले पुरळ खाजवणे टाळावे आणि त्रास वाढल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे
घामोळ्यांपासून बचावासाठी -
भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करा.
सुती व सैलसर कपड्यांचा वापर करा.
दुपारच्या उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळा.
घामोळे खाजवू नका.
त्रास वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.