विशाखपटणम : सामना कसा संपवायचा यावर वर्षभर मी लक्ष केंद्रित केले होते. त्यावर मेहनत घेतली, असे लखनऊविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला रोमहर्षक विजय मिळवून देणारा विस्फोटक फलंदाज आशुतोष शर्मा म्हणाला.
गेल्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना फिनिशिंग स्कीलमुळे आशुतोषने लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्याला गत हंगामात अपेक्षित समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती.
रेल्वेकडून खेळणाऱ्या या २६ वर्षीय खेळाडूने आयपीएल २०२५ च्या सलामीच्या लढतीत ३१ चेंडूंत नाबाद ६६ धावा चोपून दिल्लीला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
२१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ ११३ धावांवर ६ फलंदाज बाद अशा अडचणीत सापडला होता. त्यावेळी आशुतोष शर्मा आणि आयपीएलमधील पदार्पणवीर विपराज निगम या जोडगोळीने सामन्याचे पारडे फिरवले. इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे आशुतोषला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने केलेली खेळी त्याच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय खेळी ठरली आहे.
पहिल्या २० चेंडूंत त्याने २० धावा जोडल्या. त्यानंतर मात्र आवश्यकता ओळखून गिअर बदलला. शेवटच्या ११ चेंडूंत त्याने ४६ धावा फटकावत सामन्याचा शेवट केला. त्याने या खेळीत ५ षटकार लगावले.
गेल्या हंगामात बऱ्याचदा आपल्या संघाला सामना जिंकून देण्यात अपयश आले. त्यानंतर वर्षभर मी यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. अखेरच्या षटकापर्यंत मी टिकून राहिलो तर काहीही शक्य होऊ शकते असा विश्वास आशुतोषने व्यक्त केला.
कमजोरीत सुधारणा केली
विपराज चांगला खेळला. फटकेबाजी सुरूच राहुदे असा मी त्याला सल्ला दिला होता. दबावाखाली तो अतिशय शांत होता. सामनावीराचा पुरस्कार मी मार्गदर्शक शिखर धवन यांना समर्पित करतो, असे आशुतोष म्हणाला. गत वर्ष खूप चांगले गेले, पण आता तो माझ्यासाठी इतिहास आहे. त्यातल्या सकारात्मक गोष्टी मी घेतल्या आणि माझ्या खेळावर काम केले. माझ्यातील कमजोरीत सुधारणा केली, असे आशुतोष म्हणाला.