मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या प्ले-ऑफमधील शेवटची जागा निश्चित करण्यासाठी राजस्थान रॉयल्स रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. मुंबईतील कडाक्याच्या उकाड्यात आणि दमट हवामानात दोन्ही संघांच्या सहनशीलतेची आणि तंदुरुस्तीची परीक्षा पाहणारा हा वानखेडे स्टेडियमवरील सामना असेल.
सलग पराभवांचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी हा सामना केवळ सन्मान राखणारा ठरेल. हा सामना गमावल्यास, राजस्थानचे प्ले-ऑफ फेरीत खेळण्याचे स्वप्न संपुष्टात येईल, मात्र त्यांनी मुंबईवर त्यांच्याच मैदानावर मात केल्यास त्यांचे प्ले-ऑफ फेरीतील स्थान पक्के होईल. त्यामुळे हा सामना प्ले-ऑफ फेरीचे चित्र स्पष्ट करणारा ठरणार आहे.
गुणतालिकेत सध्या १४ गुणांसह चौथ्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. हा विजय त्यांना १६ गुणांवर घेऊन जाईल, ज्यामुळे ते पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या स्पर्धेत कायम असलेल्या दोन्ही संघांपेक्षा किमान स्थान एक गुण पुढे राहतील. परंतु रविवारी राजस्थानचा पराभव झाल्यास, त्यांना प्ले ऑफमध्ये मिळवण्यासाठी पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांनी त्यांच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यांमध्ये पराभूत व्हावे, अशी नार्थना करावी लागेल. राजस्थान पराभूत झाल्यास, पंजाब आणि कोलकाताला प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळवण्याची संधी मिळेल.
राजस्थान रॉयल्सने त्यांच्या गेल्या नाच सामन्यांपैकी बहुतांश सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला असला, तरी या मैदानाचा लहान आकार लक्षात घेता, मुंबईविरुद्ध विजयाची आशा त्यांना नक्कीच असेल. सलामीवीर वैभव
सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीपेक्षाही यशस्वी जैस्वाल हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. मुंबईचाच स्थानिक खेळाडू असलेल्या या भारतीय सलामीवीराने गुवाहाटीमध्ये जसप्रीत बुमरा आणि कंपनीविरुद्ध अवघ्या ३२ चेंडूत ७७ धावा कुटल्या होत्या, ज्याने सामन्याच्या पहिल्या भागातच निकाल स्पष्ट केला होता.
वानखेडे स्टेडियमवरच आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या मुंबईकर यशस्वी जैस्वालने तीन वर्षांपूर्वी याच मैदानावर आपले पहिलेवहिले आयपीएलमधील शतक झळकावले होते. तसेच मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्याने आपले दुसरे शतक ठोकले होते. तरीही राजस्थानला त्यांचा कर्णधार रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांच्याकडून अधिक सातत्याची आवश्यकता असेल. हे दोन्ही खेळाडू फलंदाजीत महत्त्वपूर्ण स्थानांवर आहेत, परंतु मधल्या षटकांमध्ये त्यांनी अपेक्षित वेग दिलेला नाही.
जुरेलच्या फलंदाजीत काही वेळा आक्रमकतेचा अभाव दिसला आहे, तर पराग सातत्यपूर्ण कामगिरीच्या शोधात आहे. सध्याच्या फॉर्मचा विचार करता राजस्थान रॉयल्स हा अधिक धोकादायक संघ वाटत आहे, कारण त्यांच्याकडे फॉर्मात असलेले आणि गरजेच्या वेळी कामगिरी करण्यास सज्ज असलेले अनेक खेळाडू आहेत. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, मुंबई इंडियन्सची गेल्या पाच सामन्यांमधील कामगिरी राजस्थानसारखीच असून त्यांनी तीन पराभव आणि दोन विजय नोंदवले आहेत. मुंबईचा संघ चार विजयांसह ८ गुणांनिशी नवव्या स्थानावर आहे. प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान कधीच संपुष्टात आल्यामुळे मुंबईचा संघ घरच्या मैदानावर आपल्या सन्मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी खेळण्यास उत्सुक असेल. हा सामना मुंबईच्या फॉर्मसाठी झगडणाऱ्या सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा सारख्या भारतीय स्टार खेळाडूंना प्रभावी कामगिरी करून हंगामाचा शेवट सकारात्मक करण्याची अंतिम संधी देईल.
वानखेडेवर रंगणार २० हजार मुलांचा क्रीडा उत्सव
रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी राबवल्या जाणाऱ्या एज्युकेशन अॅड स्पोर्ट्स फॉर ऑल म्हणजेच ईएसए उपक्रमांतर्गत रविवारी २४ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर अनोखा क्रीडा उत्सव रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरातमधील वंचित पार्श्वभूमी, आदिवासी जमाती व गावांमधील २० हजारहून अधिक मुले स्टेडियममध्ये एकत्र येतील. यामध्ये २०० हून अधिक विशेष मुलांचा समावेश आहे. नीता अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात यंदा पहिल्यांदाच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे १०० अंध विद्यार्थी आपल्या मित्रांसह या सामन्याचा आनंद लुटणार आहेत.
५००हून अधिक बेस्ट बसेसची व्यवस्था
मुलांच्या सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी ५०० हून अधिक बेस्ट आणि खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवासादरम्यान वैद्यकीय पथके, पोलीस आणि वाहतूक पोलीस तैनात असतील. तसेच विविध सेवाभावी संस्था, रिलायन्स आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील २ हजारहून अधिक स्वयंसेवक या कामात मदत करणार आहेत. मुलांसाठी १ लाखहून अधिक फूड बॉक्स आणि मैदानावर आवश्यक कर्मचाऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, क्रिश भगत, केशव महाराज.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, अॅडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुंजा, युधवीर सिंग.
वेळ : दुपारी ३.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप