मुंबई : लहान वयात आपण ज्या क्लब अथवा अकादमीचे प्रतिनिधित्व करतो त्यांच्याशी कायम एकनिष्ठ रहा, असे आवाहन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी युवा खेळाडूंना केले. ड्रीम११ चषक क्रिकेट स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या वयोगटातील अंतिम फेरीत एमआयजी क्रिकेट क्लबने वेंगसरकर क्रिकेट अकादमीवर ५ गडी राखून मात केली. या स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभासाठी वेंगसरकर उपस्थित होते.
“लहान वयात तुमच्या गुणवत्तेला खतपाणी घालण्याचे काम करून जो क्लब तुम्हाला मोठा करतो, त्याला कधीच विसरू नका. तुम्ही चांगले खेळू लागल्यावर असंख्य क्लब तुम्हाला त्यांच्याकडून खेळण्यासाठी पैशांचे आमिष दाखवतील अथवा अन्य सुविधांचा वर्षाव करतील. मात्र तुम्ही आपल्या क्लबशी एकनिष्ठ रहा,” असे वेंगसरकर यांनी नमूद केले. ओव्हल मैदान येथे वेंगसरकर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेंगसरकर अकादमीने ३५ षटकांत ८ बाद १५० धावा केल्या. वरद राजने त्यांच्याकडून सर्वाधिक ४४ धावा केल्या. एमआयजीकडून आर्यन देसाईने २५ धावांत ३ बळी मिळवले.
त्यानंतर आर्यन खोत (४३) व अगस्त्य काशीकर (३५) यांनी ८७ धावांची सलामी नोंदवल्याने एमआयजी संघाने ३३.२ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. वेदांग मिश्रा (३९) व मनन सिंघवी (१४) यांनीही उपयुक्त योगदान दिले. आर्यन सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.