मुंबई : वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्धच्या साखळी सामन्यात मुंबईने अडखळती सुरुवात केली. ब-गटातील या लढतीत मुंबईने पहिल्या दिवशी चहापानापर्यंत ७ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली होती.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सलग तीन सामने जिंकून गटात अग्रस्थान राखले आहे. मात्र अंकित राजपूत आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे फलंदाज ढेपाळले. रहाणे (८), भूपेन लालवाणी (१५), शिवम दुबे (४) यांनी निराशा केली. ५ बाद ७४ वरून शम्स मुलानी (नाबाद ४१) व प्रसाद पवार (३६) यांनी सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचून मुंबईला सावरले.