मुंबई : ३३ वर्षीय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरकडे आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरपासून रणजी स्पर्धा सुरू होणार असून त्यासाठी शुक्रवारी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला. श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव यावेळी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांना तूर्तास रणजी संघात स्थान लाभलेले नाही.
३७ वर्षीय अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात रहाणे फक्त खेळाडू म्हणून मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे. एकेकाळी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या रहाणेने २०२४मध्ये मुंबईला विक्रमी ४२व्यांदा रणजीचे जेतेपद मिळवून दिले. मात्र २०२५च्या हंगामातील अपयश, वाढते वय व भविष्याचा विचार करता रहाणेने आता नव्या कर्णधाराला घडवण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने मुंबईसाठी २०१ प्रथम श्रेणी सामन्यांत १४ हजार धावा केल्या असून यामध्ये ४१ शतकांचा समावेश आहे.
आता शार्दूलच्या नेतृत्वात संघ जेतेपद मिळवेल, अशी आशा आहे.
मुंबईचा संघ
शार्दूल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सर्फराझ खान, शिवम दुबे, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सेव्हेस्टर डीसोझा, इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.