संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

WTC ची फायनल गाठण्यासाठी भारताला सहापैकी चार सामने जिंकणे अनिवार्य

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्यासाठी उरलेल्या सहापैकी (१ विरुद्ध न्यूझीलंड, ५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया) किमान ४ लढती जिंकणे अनिवार्य

Swapnil S

दुबई : न्यूझीलंडविरुद्ध पहिले दोन्ही कसोटी सामने गमावल्याने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, WTC) अंतिम फेरी गाठण्यासाठी उरलेल्या सहापैकी (१ विरुद्ध न्यूझीलंड, ५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया) किमान ४ लढती जिंकणे अनिवार्य आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व न्यूझीलंड अद्याप अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून आहेत.

तूर्तास भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्ध १, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामने शिल्लक आहेत. मात्र भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील टक्केवारीतील अंतर फार कमी आहे. भारताची टक्केवारी ६२.८२ इतकी आहे, तर ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्केवारीसह दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका (५५.५६), न्यूझीलंड (५०.००), दक्षिण आफ्रिका (४७.६२) अनुक्रमे तिसऱ्या ते पाचव्या क्रमांकावर आहेत.

त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीतील स्थान पक्के करायचे असेल, तर भारताने न्यूझीलंडविरुद्ध तिसरी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत किमान ३-२ अशा फरकाने नमवणे गरजेचे आहे. २ पेक्षा अधिक कसोटी गमावल्यास अथवा अनिर्णित राखल्यास भारताला फटका बसू शकतो. कारण अन्य संघही त्यांच्या कामगिरीनुसार आगेकूच करतील व गुणतालिकेत वरचे स्थान मिळवतील.

दरम्यान, न्यूझीलंडची भारताविरुद्ध १, तर इंग्लंडविरुद्ध ३ कसोटी शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्ध २ व भारताविरुद्ध ५ कसोटी खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका बांगलादेशविरुद्ध १, तर श्रीलंका व पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी २ म्हणजेच आणखी ५ कसोटी सामने पुढील ४ महिन्यांत खेळणार आहे. श्रीलंकेचा संघ आफ्रिका व ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी २ सामने खेळणार आहे.

Mumbai : उष्माघातामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन; हीट स्ट्रोकचा वाढता धोका, डॉक्टरांचा इशारा

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज; १५ जूनपासून विशेष वेळापत्रक लागू, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य

विषारी दारू प्रकरणाने पुणे हादरले; ८ जण ताब्यात, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

नवी मुंबई महापालिकेचा करवसुलीचा मार्ग मोकळा; टीटीसी एमआयडीसीतील मालमत्ताकरावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

वेंगुर्ला-वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर परप्रांतीय भूमाफियांचा पुन्हा हैदोस; कांदळवन नष्ट करून जमीन बळकावण्याचे प्रकार