क्रीडा

चित्तथरारक सामन्यांत वेस्ट इंडिजचा भारतावर विजय; ओबेद मॅकॉय सामनावीर ठरला

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली.

वृत्तसंस्था

अखेरच्या षट्कापर्यंत चित्तथरारक झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर पाच गडी राखून विजय मिळविला. शेवटच्या षट्कात भारताच्या आवेश खानने टाकलेला पहिलाच चेंडू नो बॉल ठरला आणि तिथेच सामना भारताच्या हातून निसटला. या विजयासह विंडीजच्या संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अवघ्या १७ धावांच्या मोबदल्यात सहा बळी टिपणाऱ्या ओबेद मॅकॉयला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा भोपळा फोडण्याआधीच बाद झाला. त्यानंतर ठरावीक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत गेले. भारताचा डाव १९.४ षट्कांत अवघ्या १३८ धावांत संपुष्टात आला. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने ३१ चेंडूंत सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजा (३० चेंडूंत २७) आणि ऋषभ पंत (१२ चेंडूंत २४) यांनी समाधानकारक आव्हान उभे करण्यात यश मिळविले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये जोरदार फटकेबाजी केली. पहिल्या सहा षट्कांमध्येच ४६ धावा झोडपून काढल्या. पॉवर प्लेनंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या धावगतीला आळा बसला.

अखेरच्या षट्कात वेस्ट इंडिजला विजयासाठी १० धावांची आवश्यकता असताना आवेश खानकडून पहिल्याच चेंडूवर चूक झाली. हा चेंडू नो बॉल ठरला. त्यानंतर मिळालेल्या फ्री हिटचा फायदा घेत विंडीजच्या डेवोन थॉमसने षट्कार खेचला आणि दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्रँडन किंगने (५२ चेंडूंत ६८) आणि डेवोन थॉमस (१९ चेंडूंत ३१) यांनी फटकाविलेल्या धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार होता; मात्र वेस्ट इंडिजच्या संघाला साहित्य मिळण्यास विलंब झाल्याने सामन्याला उशीर झाला. रात्री ११ वाजता दोन्ही संघ मैदानावर उतरले.

इराणच्या राजधानीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला; आणीबाणी जाहीर, भारतीय नागरिकांना दूतावासाचा इशारा

"तो भारदस्त आवाज पुन्हा…"; अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबीयांच्या भावनिक पोस्ट

होळीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग Ro-Ro सेवा उद्यापासून सुरू; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

वाहतूकदारांचा 'महाराष्ट्र बंद'चा इशारा; ५ मार्चला १ लाख वाहनांसह 'चलो आझाद मैदान'; ई-चलन व जाचक अटींविरोधात आरपारचा लढा