क्रीडा

चित्तथरारक सामन्यांत वेस्ट इंडिजचा भारतावर विजय; ओबेद मॅकॉय सामनावीर ठरला

वृत्तसंस्था

अखेरच्या षट्कापर्यंत चित्तथरारक झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर पाच गडी राखून विजय मिळविला. शेवटच्या षट्कात भारताच्या आवेश खानने टाकलेला पहिलाच चेंडू नो बॉल ठरला आणि तिथेच सामना भारताच्या हातून निसटला. या विजयासह विंडीजच्या संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अवघ्या १७ धावांच्या मोबदल्यात सहा बळी टिपणाऱ्या ओबेद मॅकॉयला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा भोपळा फोडण्याआधीच बाद झाला. त्यानंतर ठरावीक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत गेले. भारताचा डाव १९.४ षट्कांत अवघ्या १३८ धावांत संपुष्टात आला. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने ३१ चेंडूंत सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजा (३० चेंडूंत २७) आणि ऋषभ पंत (१२ चेंडूंत २४) यांनी समाधानकारक आव्हान उभे करण्यात यश मिळविले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये जोरदार फटकेबाजी केली. पहिल्या सहा षट्कांमध्येच ४६ धावा झोडपून काढल्या. पॉवर प्लेनंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या धावगतीला आळा बसला.

अखेरच्या षट्कात वेस्ट इंडिजला विजयासाठी १० धावांची आवश्यकता असताना आवेश खानकडून पहिल्याच चेंडूवर चूक झाली. हा चेंडू नो बॉल ठरला. त्यानंतर मिळालेल्या फ्री हिटचा फायदा घेत विंडीजच्या डेवोन थॉमसने षट्कार खेचला आणि दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्रँडन किंगने (५२ चेंडूंत ६८) आणि डेवोन थॉमस (१९ चेंडूंत ३१) यांनी फटकाविलेल्या धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार होता; मात्र वेस्ट इंडिजच्या संघाला साहित्य मिळण्यास विलंब झाल्याने सामन्याला उशीर झाला. रात्री ११ वाजता दोन्ही संघ मैदानावर उतरले.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम