उल्हासनगर : लखनऊ-मुंबई प्रवासात सोन्याने भरलेली बॅग गायब झाली होती. आठ महिन्यांच्या तपासानंतर उल्हासनगरमधील चौघांना अटक झाली. आता चौघांना जामीन झाला आहेे.
नोएडा पोलिसांचे विशेष पथक सोमवारी मध्यरात्री शहरात दाखल झाले. विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने नोएडा पोलिसांनी हायप्रोफाईल परिवारांतील भाविषा राजानी, संतोष चौहान, धीरज लालचंदानी आणि कमल पंजाबी या चौघांना अटक केली. अटक झालेल्यांपैकी एका आरोपीचे संबंध सत्ताधारी राजकीय पक्षाशी असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
उल्हासनगरातील राहुलनगर परिसरातील रहिवासी राजविंदर सिंह यांनी ग्रेटर नोएडाच्या जेवर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, मार्च २०२५ मध्ये त्यांनी त्यांच्याकडे काम करणारे विक्की काटेजा आणि संतोष चौहान यांना लखनऊ येथील एका मित्राकडून मौल्यवान वस्तू आणण्यासाठी पाठवले होते. १० मार्च रोजी दोघे आलमबाग येथून दिल्लीकडे जाणाऱ्या शयनयान बसमध्ये प्रवास करत असताना कोट्यवधी रुपयांचे सोने, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू असलेली काळ्या रंगाची बॅग गायब झाली. याप्रकरणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नोएडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.