ठाणे : कायम टीकेचे धनी ठरलेले कळवा येथील ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय गैरसोयीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. या रुग्णालयातील प्रसूतिगृहात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. २५ बेड क्षमतेच्या या विभागात सध्या ३२ महिला दाखल असून, आणखी आठ महिला प्रसूतीसाठी प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.
शहरातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे रुग्णालय आशेचा किरण मानले जाते. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि मर्यादित पायाभूत सुविधांमुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागेअभावी अनेक महिलांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा मुंबईतील केईएम रुग्णालयात पाठविण्याची वेळ येत आहे. अलीकडेच ठाण्यातील एका गर्भवती महिलेच्या कुटुंबाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. त्या महिलेला डिसुझा वाडी आरोग्य केंद्रातून कळवा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर 'बेड फुल' असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी सोनोग्राफी करून येण्यास सांगितले आणि परत आल्यावर ठाणे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. या दरम्यान त्या गर्भवती महिलेला आणि तिच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला.
रुग्णालयातील ही स्थिती केवळ रुग्णसंख्या वाढीची नव्हे, तर वैद्यकीय सेवांतील तुटवड्याची गंभीर जाणीव करून देणारी आहे. गोरगरीबांसाठी चालविलेल्या या रुग्णालयातील अशा परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीगृहात २५ बेड्सची क्षमता आहे. सध्या ३२ गरोदर महिला दाखल असून, विभाग फुल झाल्याने महिलांना स्थिर करून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय अथवा मुंबईतील केईएम रुग्णालयात पाठविले जात आहे.अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा