कर्जत : गेल्या १०० वर्षांपासून कर्जत येथील बाजारपेठ मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची आणि मसाले खरेदी करतात. उन्हाचा पारा जसा वाढला आहे तसेच महिलांची गर्दी मिरची खरेदी करण्यासाठी वाढली आहे. गेल्या वर्षीपेक्षा मिरचीचे दर दुप्पट झाले आहेत.
मिरची खरेदी करून मसाल्याचे पदार्थ त्यात टाकून तिखट मसाला बनविण्याची परंपरा कायम आहे. ज्यांना कर्जतच्या मसाल्याची सवय आहे. आपण तयार केलेले मसाले जास्त दिवस टिकतात. अशी अनेकांचे म्हणणे आहे. अशी कुटुंब वर्षभरासाठी मसाला तयार करून ठेवतात. ग्रामीण भागात लग्न सोहळ्यासाठी भोजनाला चांगली चव येण्यासाठी लग्नकार्य ज्यांचे घरी आहे अशा कुटुंबात साधारण वीस ते पंचवीस किलो मसाला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. हा बाजार चार ते पाच महिने असतो आणि त्यात सुमारे दोन-अडीच कोटी रुपयांची उलाढाल होत असते.
मिरची विकत घेण्यासाठी अगदी पेण, अलिबाग, पनवेल, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, लोणावळा, पुणे येथूनच नव्हे तर मुंबईतूनही ग्राहक येत असतात. परदेशातही आपल्या नातेवाईकांना कर्जतमधून मिरची घेऊन मसाला तयार करून पाठवण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. यंदा किंमतीच्या बाबतीत मिरची खूपच ‘तिखट’ झाली आहे परंतु तरीही मिरची व खडे मसाले घेण्यासाठी बहुतांश दुकानात ग्राहकांची गर्दी असते.
१००वर्षाची परंपरा.....
सुमारे १०० वर्षांपासून कर्जतचा मिरची बाजार भरत आहे. कर्जत शहरातील महावीर पेठेत १०-१२ दुकानांमध्ये मिरची व खडे मसाले विक्रीसाठी असतात. आज शहरातील बाजारपेठेत दुकानांची संख्या कमी झालेली आहे. मात्र कर्जतचे बाजारातील मिरची ही महिला वर्गात अधिक प्रिय आहे. हैदराबाद - वारंगल, आंध्रप्रदेश - गंटूर, तेलंगणा आदी राज्याच्या अनेक भागातून मिरची या बाजारात येत असते. जयंतीलाल परमार, मदन परमार, शिवलाल गुप्ता हे व्यापारी आपल्या तीन - चार पिढ्यांपासून हा मिरचीचा व्यापार करतात. काही छोटे व्यावसायिक व्यवसाय करतात.