राज्यभरात निवडणुकांची धामधुम सुरु असताना सर्वच उमेदवार त्यांचे अर्ज दाखल करण्यात व्यस्त होते. अशातच, कल्याण-डोंबिवलीमधून एक लक्षवेधी माहिती समोर आली आहे. केडीएमसीच्या (KDMC) निवडणुकांमध्ये मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. या दोघींनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
भाजपच्या दोन महिला उमेदवार, कल्याण पूर्वमधील महिला आघाडीची अध्यक्षा रेखा राजन चौधरी आणि डोंबिवली पूर्वमधील आसावरी केदार नवरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.
पक्ष नेतृत्वाकडून अभिनंदन
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या दोन्ही उमेदवारांचा परिचय करून दिला आणि बिनविरोध झाल्याचे सांगितले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी "तुम्ही भाजपचं खातं उघडलं, विजय ही विजय हैं" असे म्हणत त्यांचं अभिनंदन केलं.
"बिनविरोध विजय हा पक्षाच्या मजबूत संघटनात्मक ताकदीचा आणि जनतेच्या विश्वासाचा प्रत्यय असल्याचे आणि हा विजय भाजपच्या नेतृत्वावर आणि सुशासनावर मतदारांचा वाढता विश्वास दर्शवतात,” असे पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
रेखा राजन चौधरी एकमेव उमेदवार
कल्याणपूर्वेतील पॅनल क्रमांक १८ (अ) मध्ये कचोरे, नेतिवली टेकडी, गावदेवी, नेतिवली-मेट्रो मॉल आणि शास्त्रीनगर या भागांचा समावेश आहे. या पॅनलमधून माजी नगरसेविका रेखा राजन चौधरी या एकमेव उमेदवार ठरल्या आहेत.
आसावरी केदार नवरे बिनविरोध विजयी
त्याचप्रमाणे, डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक २६ (क) ज्यामध्ये म्हात्रे नगर, राजाजी पथ, रामनगर, शिव मार्केट आणि सावरकर रोड या भागांचा समावेश आहे. येथे भाजपच्या आसावरी केदार नवरे या देखील बिनविरोध राहिल्या आहेत.
या दोन्ही प्रभागांमध्ये कोणताही विरोधी उमेदवाराचा अर्ज दाखल न झाल्याने, उमेदवारी अर्जांची छाननी आणि अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
कल्याण-डोंबिवलीत मध्ये भाजपचे खाते उघडले
या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला पहिले अधिकृत यश मिळाले असून, केडीएमसीमध्ये मतदानापूर्वीच पक्षाने आपले खाते उघडले आहे. या बातमीमुळे कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणूक लढतीपूर्वी हे मोठे मनोबल वाढवणारे ठरत आहे.
राजकीय महत्त्व
युतीतील बदल, बंडखोर उमेदवार आणि महत्त्वपूर्ण लढतींमुळे केडीएमसी (KDMC) निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत दोन प्रभाग बिनविरोध जाणे हे भाजपसाठी मानसिक आणि रणनीतिक दृष्ट्या मोठे यश मानले जात आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील महत्त्वाच्या शहरी भागांमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद यामुळे अधोरेखित झाली आहे.