डोंबिवली : कल्याण -डोंबिवली मनपातील (केडीएमसी) तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. या प्रकारामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.
केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे अधिकारी वसंत देवळूरकर आणि सुदर्शन जाधव यांनी आजारी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ठाणे लाचलुचपत विभागाने सापळा रचत, २५ जुलै रोजी त्यांना २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
दरम्यान, केडीएमसीचे सहाय्यक अभियंता रवींद्र आहिरे याला देखील बांधकाम परवानगी देण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून ४० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
या ताज्या कारवाईनंतर केडीएमसीमधील लाचखोरीच्या प्रकरणांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. याआधीही अनेक अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना पकडले गेले असून, प्रशासनातील भ्रष्टाचाराचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत.
ठाणे लाचलुचपत विभागाकडून या तिघांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अधिकाऱ्यांच्या वरच्या पातळीपर्यंत चौकशी होण्याची शक्यता आहे. यापुढील कारवायांमुळे आणखी काही नावं बाहेर येण्याची शक्यता प्रशासनातून वर्तवली जात आहे.