ठाणे : ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात नुकतेच उभारण्यात आलेले ‘महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले’ या आशयाचे भव्य फलक सध्या शहरात चर्चेचा प्रमुख विषय ठरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी या फलकाची संकल्पना साकारली असून, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांना आणि मराठी जनतेच्या भावना व्यक्त करणारा हा फलक प्रतीकात्मकदृष्ट्या अत्यंत अर्थपूर्ण मानला जात आहे.
या फलकात महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर दोन पिढ्यांच्या नेतृत्व परंपरेचे प्रतीकात्मक चित्रण करण्यात आले आहे. जनतेच्या आशीर्वादाने पुढे जाणाऱ्या नेतृत्वाचे चित्र, जयघोष करणारा जनसमुदाय, हातात झेंडे घेऊन उभे कार्यकर्ते आणि आकाशात झळकणारा तेजोमय प्रकाश या सर्व दृश्यांमधून “जनतेचा विश्वास आणि महाराष्ट्राचे स्वप्न साकार झालं” हा भावनिक संदेश अधोरेखित करण्यात आला आहे.
राज्याच्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या फलकातील ‘दोन पिढ्यांची एकत्रता’ हे चित्रण राजकीय पुनर्मिलनाचा संकेत देत असल्याचे जाणकारांचे मत आहे. फलकामागील संदेश आणि त्यातील सूचक प्रतीकात्मकता यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.
दरम्यान, या फलकाचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. नागरिक आणि राजकीय वर्तुळात या फलकामागील संदेश, त्याचे राजकीय परिणाम आणि आगामी निवडणुकांवरील संकेत यावर चर्चा रंगली आहे. नितीन कंपनी चौक परिसर आता राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरले असून, या फलकाने महाराष्ट्रातील राजकारणाला एक नवीन कलात्मक आणि प्रतीकात्मक वळण दिल्याची चर्चा ठाण्यात सुरू आहे.
वीस वर्षांनंतर ठाकरे कुटुंब एकत्र आले आहे. मराठी माणसाचे स्वप्न आता वास्तवात उतरले आहे. आगामी काळात मराठीसाठीचा लढा अधिक तीव्र होईल आणि मराठी माणसाला सुखाचे दिवस नक्की येतील.स्वप्नील महिंद्रकर, मनसे नेते