डोंबिवली : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षाचालकांचा १ मेपासून परवाना रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने हा मुद्दा उचलून धरत ‘मला मराठी समजते, मी मराठी बोलतो’ असा स्पष्ट संदेश देणारे स्टिकर्स रिक्षांवर लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कल्याण-डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, रिक्षाचालकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आरीफभाई शेख, उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे, शहर संघटक तकदीर काळण, उपविभाग अध्यक्ष प्रवीण भोईर, शाखा अध्यक्ष प्रविण बोऱ्हाडे यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शनिवारी रोजी मनसेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. पक्षाचे नेते तथा माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. सार्वजनिक वाहतूक सेवेत मराठी भाषेचा सन्मान राखला जावा आणि सामान्य मराठी माणसाला आपल्या राज्यात भाषेची अडचण भासू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.