ठाणे : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कुठलेही राजकारण करण्यात आले नाही. या बँकेच्या माध्यमातून चांगले नेते घडविण्यात आले असून त्यातील अनेक नेते आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत १०० टक्के सत्ता सहकार पॅनलची येणार असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. तसेच १७ तारखेला अर्ज माघारीचा दिवस असल्याने त्यादिवशी समोरच्या पॅनलमधल्यांनी अर्ज माघार घेता आली तर पाहावे, अशी खोचक टीका देखील सरनाईक यांनी केली.
ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २१ संचालक पदांपैकी १० संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. अशातच जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील वर्चस्वासाठी भाजप-शिवसेना महायुतीच्या परिवर्तन पॅनलची स्थापना ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यासह सर्व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानेच झाल्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री व परिवर्तन पॅनलचे प्रमुख कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सोमवारी सर्वपक्षीय ‘सहकार पॅनल’ची घोषणा शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के व भाजप आमदार किसान कथोरे यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, बविआचे क्षितीज ठाकूर, यांसह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकोप्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून म्हणजेच २५ वर्षांपासून जिल्हा बँकेशी जोडलो गेलो आहे. आजपर्यंत बँकेतील खातेदारांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध असल्याने बँकेवर कुठल्याही प्रकारचे आरोप करण्यात आले नाहीत. महायुतीच्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत अथवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विश्वासात न घेतल्याने ‘सहकार पॅनल’ची घोषणा करण्यात आली असून या पॅनलच्या माध्यमातून ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे केले आहेत.किसान कथोरे, आमदार, भाजप.