उल्हासनगर : कल्याण-माळशेज महामार्गावरील शहाड उड्डाणपुलाचे सशक्तीकरण आणि वेअरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे, हा पूल २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक विभागाने या बदलामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी विशेष अधिसूचना जारी केली असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
उल्हासनगर वाहतूक उपविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठाणे यांच्या वतीने हे काम केले जाणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री ००:०१ वाजेपासून ते १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२:०० वाजेपर्यंत या १८ दिवसांच्या कालावधीत शहाड उड्डाणपुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
जड वाहनांसाठी वेळेचे निर्बंध
या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर वेळेनुसार निर्बंध घालण्यात आले आहेत. सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या प्रवेशबंदीमध्ये पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस टँकर आणि अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मात्र या नियमातून सूट देण्यात आली आहे.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोटार वाहन कायद्यांतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शहाड पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत उल्हासनगर, कल्याण, बदलापूर आणि मुरबाड परिसरातील नागरिकांनी वाहतूक विभागास सहकार्य करून पर्यायी मार्गाचा वापर करावा.पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त ठाणे शहर वाहतूक विभाग
वाहतूक दिशा - माळशेजकडून कल्याणकडे
येथे थांबा - डॅम फाटा
पर्यायी मार्ग - बदलापूर रोड पालेगाव नेवाळी नाका मंलग रोड लोढा पलावा/शिळ डायघर रोड → पत्रीपूल मार्गे कल्याण.
वाहतूक दिशा - मुरबाडकडून कल्याणकडे (शहाड पुलावाटे जाणारी)
येथे थांबा - दहागाव फाटा (रायतागाव)
पर्यायी मार्ग - वाहोली → मांजर्ली दहागाव एरंजडगाव बदलापूर पालेगाव → नेवाळी नाका मंलग रोड लोढा पलावा/शिळ डायघर रोड पत्रीपूल मार्गे कल्याण.
वाहतूक दिशा- कल्याणकडून मुरबाडकडे
येथे थांबा - दुर्गाडी पूल
पर्यायी मार्ग - गोविदवाडी बायपास पत्रीपूल चक्की नाका → नेवाळी पालेगाव → बदलापूरमार्गे मुरबाड .
शहाड पुलासाठी मनसे आक्रमक
उल्हासनगर : शहाड रेल्वे स्थानकाजवळीलउड्डाणपुलावरील दयनीय अवस्थेमुळे उल्हासनगरमधील नागरिक त्रस्त झाले असून, अपघात आणि जीवघेणी वाहतूककोंडी यामुळे वाढलेल्या रोषानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या पुलावर रास्ता रोको आंदोलन छेडले. १५ ऑक्टोबरपर्यंत पुलाची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला.