ओंकार पातकर/शहापूर
तालुक्यातील आदिवासी गाव-पाड्यावर पाणीटंचाईचा विळखा वाढत चाललेला असताना अतिदुर्गम गाव- पाड्यावरील ग्रामस्थांनी मात्र पाण्यासाठी चक्क जुना पर्याय अवलंबत मागील दहा-पंधरा वर्षांपासून अडगळीत गेलेले बैलगाडी पुन्हा पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र शहापूरमध्ये दिसू लागले आहेत.
शहापूर तालुक्यातील तानसा, मोडक सागर धरणातून मुंबई, ठाण्यासारख्या शहरांना नियमित पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यालाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील ५० टक्के गावांमधून शहरातील पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्या जात आहेत. तर भातसा धरणातून मुंबईला जाणारे पाणी हे भातसा नदीद्वारे मुंबईला जाते,त्या नदीच्या काठावर असलेल्या ३० टक्के तालुक्यात गावे वसलेली आहेत. विशेष म्हणजे भातसा नदी किनारी असलेल्या गावांना पाणीटंचाई भेडसवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे मात्र तालुक्यातील ७० टक्के गावांना या धरणांचा काडीमात्र उपयोग होत नसल्याने या गावांमध्ये डिसेंबर - जानेवारीपासूनच पाणीटंचाईला तोंड देण्यास सुरुवात होते.
शहापूर तालुक्यातील २७ गावे व १०२ पाडे यांना ३७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून उन्हाची दाहकता पाहता यात एप्रिल अखेरपर्यंत आणखी गाव - पाड्यांना पाणीटंचाईची झळ बसू शकते.
पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर व त्यासाठी असलेले वाहनांचे भाडे यांचा कुठेच आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेने आपले दहा -पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या बैलगाड्यांना पुन्हा रस्त्यावर उतरविले आहे. ग्रामीण भागात आदिवासी पाड्यावर या बैलगाड्यांच्या माध्यमातून २०० लिटर पाण्याची वाहतूक सहजरित्या केली जात आहे.
तालुक्यातील ग्रामपंचातीकडून टँकरची मागणी आली की लगेच त्याचा प्रस्ताव बनवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जात असून तालुक्यातील जनता पाण्यापासून वंचित न राहावी,यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- किशोर गायकवाड, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, शहापूर
आमच्या आदिवासी पाड्यावर दोन - तीन दिवसाआड पाण्याचे टँकर येत असून तो आला तरी दोन चार हांडे पाणी मिळते. त्यामुळे शेतीसह पाण्याची तहान भागवण्याचे काम आमचे बैल करत आहेत. पाण्यासाठी पाच-दहा किमी वणवण करणे आर्थिक तसेच शारीरिक झेपणारे नसल्यामुळे शेतकऱ्यांचे खरे साथीदार असणाऱ्या बैलगाडीच्या माध्यमातून पाण्याची तहान भागवत आहोत.
- महेश वाघ, कळंमगांव वाडी
- नवनाथ आसवले,
दांड, आदिवासी ग्रामस्थ )