भिवंडी : भारत - बांगलादेश सीमेवरून अवैधपणे भारतात येऊन भिवंडी तालुक्यात कोनगाव आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत विनापरवाना भाडे तत्त्वावर वास्तव करणाऱ्या आणखी ८ बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. यामध्ये ७ तरुणांसह एका महिलेचा समावेश आहे.
रफिक असमत शेख (४५), महमुदूल असमत शेख (२२), अन्सार शापीतअली चौधरी (३५), शिवली फिरोज विशेष (३३) अशी कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील साई अपार्टमेंटच्या धर्मनिवासमधून अटक केलेल्यांची नावे असून सुबुद्दा मुजिब शेख (३०), हैदर अमिनउल हक शेख (४२), जमाल जहूर शेख (४२), मोहम्मद भोरशेद दुलाल शेख (२६) अशी नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील विविध गावातून ताब्यात घेऊन अटक केलेल्यांची नावे आहेत.
उल्हासनगरातून महिला ताब्यात
राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणाऱ्या परदेशी नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडीत, बांगलादेशातून अनधिकृतपणे भारतात आलेल्या एका महिलेचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही महिला कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले असून तिच्यावर विदेशी व्यक्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर, एपीएमसीमधून १० जण अटकेत
खारघरमधील कोपरा गावात तसेच एपीएमसीतील कोपरी गावात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापेमारी करून अटक केली. यात २ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश असून हे सर्व बांगलादेशी नागरिक बांगलादेशातून भारतात आल्याचे व तेव्हापासून ते या भागात वास्तव्यास असल्याचे चौकशीत समजले. हे सर्व बांगलादेशी नागरिक मजुरी आणि घरकाम करत होते.