डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित चार नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याने थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त करत निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती राजन डोणे यांच्यासह चार नगरसेवक सध्या संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. यातील मधुर म्हात्रे आणि कीर्ती डोणे हे १६ जानेवारीपासून नॉट रिचेबल असल्याने, कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. कोळसेवाडी नगरसेवकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अपहरण, दबाव किंवा फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्ससह तांत्रिक पद्धतीने सखोल तपास करून तातडीने शोधमोहीम राबवावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, "नगरसेवक जिथे असतील तिथून माध्यमांसमोर यावे," असे आवाहन शरद पाटील यांनी केले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.