ठाणे : शहरातील वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणे व इतर साफसफाईच्या कामांवर १० जूनपर्यंत निर्बंध घालण्यात आले असून नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या तीव्र उन्हामुळे धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच शहरातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळीही खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.
आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
पाणी बचतीसाठी प्रभावी उपाययोजना म्हणून सर्व्हिस सेंटरमध्ये दोन, तीन व चारचाकी वाहनांसह इतर वाहनांचे धुणे व साफसफाई तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. याशिवाय सर्व व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.