बदलापूर : ठाणे जिल्ह्यची तहान भागवणारे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारवी धरण क्षेत्राला अजूनही वरुणराजाची प्रतिक्षाच आहे. या भागात पावसाची एन्ट्री झाली असली तरी तुरळक सरी पडत असून मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अवघ्या १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अशाप्रकारे दडी मारल्याने या भागातील शेतकऱ्यांचे टेन्शन अजून संपलेले नाही..
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरे, ग्रामीण भाग आणि औद्योगिक वसाहतींना बदलापूरजवळील बारवी धरणातून पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी बारवी धरण हा एक अत्यंत महत्त्वाचा जलस्त्रोत आहे. दरवर्षी बारवी धरणात जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध होण्यास सुरुवात होत असते. परंतु यंदा मात्र पावसाअभावी या धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. यामुळेच जिल्ह्यामध्ये सध्या पाणी कपात लागू करण्यात आली असून, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे बारवी धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून खाली आला असल्याने पाणी संकट गडद झाले आहे. जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी धरण क्षेत्रात तातडीने मुसळधार पाऊस कोसळण्याची अत्यंत गरज आहे. तोपर्यंत पाणी कपात कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढली असून सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले आहेत.
धरणात अपुरा पाणीसाठा
सध्या बारवी धरणाची पाणी पातळी ५७.८० मीटरवर असून, धरणाचा ओव्हरफ्लो अर्थात ओसंडून वाहण्याची पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. धरणात सध्या ७६.०७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ २२.४५ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. चालू हंगामात धरण क्षेत्रात आतापर्यंत केवळ २० मिलिमीटर एवढाच एकूण पाऊस झाला आहे.