ठाणे : क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘क्लस्टर विकास कंपनी’ला देण्यात आलेल्या अधिकारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने गुरुवारी ठाण्यात मोर्चा काढला. इटर्निटी मॉल ते कशिश पार्क येथील क्लस्टर विकास कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे पूर्व द्रुतगती महामार्गासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठी वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने ठाणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला.
आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. क्लस्टरच्या नावाखाली ठाणे शहराच्या विकासाचे अधिकार खासगी कंपनीच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. ‘क्लस्टर विकास कंपनी’ला निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यास ठाणे महापालिकेच्या महासभेचे अधिकार कमी होतील आणि लोकप्रतिनिधींचे महत्त्वही घटेल, असा दावा मनोज प्रधान यांनी केला. सुमारे चार हजार एकर क्षेत्रावर बांधकाम होणार असल्यास १२.५ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) कोणत्या आधारावर देण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मोठ्या घरांच्या रहिवाशांना केवळ ३२३ चौरस फुटांची घरे देऊन अतिरिक्त क्षेत्रासाठी शुल्क आकारण्याची तरतूद का करण्यात आली आहे, वाणिज्यिक सदनिकांच्या अतिरिक्त क्षेत्रासाठी शुल्क का आकारले जाणार आहे, तसेच घराखालील जमिनीची मालकी महापालिकेकडेच का राहणार, असे सवालही प्रधान यांनी उपस्थित केले.
पाणी, सांडपाण्याचे काय?
क्लस्टर योजनेतून किती घरे उभारली जाणार, ठाण्यात किती नवीन लोकसंख्या वाढणार, या वाढीव लोकसंख्येला पाणी कसे पुरविले जाणार, तसेच सांडपाणी आणि मलनिस्सारणाची व्यवस्था कशी केली जाणार, याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. मालकी हक्काची घरे देण्याचे सांगितले जात असताना ३० वर्षांचे करार का केले जात आहेत, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
महामार्गावर वाहनांच्या रांगा
मोर्चामुळे मुंबईच्या दिशेने नितीन कंपनी ते कापूरबावडीदरम्यान तर मुंबईहून ठाण्याकडे येताना इटर्निटी मॉल ते आनंदनगरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूककोंडीचा परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही झाला. गोखले रोड, हरिनिवास सर्कल, पाचपाखाडी, रहेजा मॉडेल, चेकनाका आणि सेवा रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली. क्लस्टर योजनेवरून राजकीय संघर्ष पेटलेला असतानाच, मोर्चामुळे झालेल्या वाहतूककोंडीने ठाणे शहरातील वाहतूक नियोजनाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला.