जागावाटपाबाबत अद्याप महायुतीकडून निमंत्रण नाही; आनंद परांजपे यांचे स्पष्टीकरण 
ठाणे

Thane Election : अजित पवारांच्या NCP कडून पुन्हा स्वबळाचा इशारा; जागावाटपाबाबत अद्याप महायुतीकडून निमंत्रणच नाही - आनंद परांजपे

ठाणे महापालिका निवडणुकीतील जागावाटपाबाबत महायुतीतील भाजप व शिंदे सेनेकडून अद्याप कोणतेही निमंत्रण नसल्याचे मत अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते व माजी खासदार आनंद परांजपे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

Krantee V. Kale

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीतील जागावाटपाबाबत महायुतीतील भाजप व शिंदे सेनेकडून अद्याप कोणतेही निमंत्रण नसल्याचे मत अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते व माजी खासदार आनंद परांजपे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी राष्ठ्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा ठाण्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याचा इशारा भाजप-सेनेला देण्यात आला.

जेव्हा महायुतीतील घटक पक्ष आम्हाला चर्चेसाठी बोलावतील, तेव्हाच आम्ही जागावाटपाबाबतचा आमचा आकडा सांगू. मात्र, जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा देण्यात आल्या नाहीत, तर ठाणे महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची पूर्ण ताकद ठेवतो, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.

१३१ जागांवर स्वबळाची तयारी

जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी ३८० हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती देत ते म्हणाले की, जर ठाण्यात अजित पवार गटाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर पक्ष स्वतंत्रपणे १३१ जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, विधानसभेप्रमाणेच जनतेने या निवडणुकांमध्येही महायुतीला कौल दिला आहे. राज्यभरात २१५ ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले असून, या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी समाधानकारक व चांगली झाली आहे. ईव्हीएमवर दोष देण्याचे काम विरोधक करत आहेत.

भाजप-सेनेतही घमासान सुरूच

दुसरीकडे, ठाण्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून जोरदार घमासान सुरू आहे. कारण ठाणे मनपा ही अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तर भाजपला शिवसेनेकडून अधिक जागा हव्या आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये होणारी तिसरी बैठक सोमवारी होणार होती. मात्र, ती न झाल्याने भाजपने ठाणे मनपाच्या १३१ जागांवर स्वबळावर निवडणुकीची चाचपणी सुरू केल्याचे उघड झाले आहे. शिंदे सेनेकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने सोमवारी भाजपने १३१ प्रभागातून आलेल्या इच्छुकांच्या अर्जांची छाननी केली. यात कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार दिला जाऊ शकतो. कोणत्या प्रभागात उमेदवार बदलावा लागेल. या संदर्भातील चर्चा करीत संपूर्ण १३१ प्रभागातील जवळ जवळ उमेदवार निश्चितीवर भाजपचे पदाधिकारी आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी बैठकीसाठी आम्हीच पुढाकार घेतल्याचा दावा भाजपने केला आहे. शिंदे सेनेकडून निरोप येत नसल्याने आता कोणत्या प्रभागात कोण विजयी ठरू शकतो, याची चाचपणी सोमवारी केली गेली आहे. शिंदे सेनेने युती करायची की नाही ते स्पष्ट करावे अन्यथा आम्हाला वेगळा विचारा करावा लागेल, अशी ताठर भूमिका भाजपने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली