ठाणे : ठाणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला वेग देण्यासाठी प्रस्तावित पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा तांत्रिक अहवाल पुढील महिनाभरात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी तांत्रिक मानके, प्रत्यक्ष व्यवहार्यता आणि सामाजिक परिणामांचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असल्याने प्रकल्पाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली माजिवडा-ओवळा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.
ठाणे शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. घोडबंदर रोड, माजिवडा, कापूरबावडी, वागळे इस्टेट आणि पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या मार्गांवर दररोज मोठी वाहतूक कोंडी होते. मेट्रो, रेल्वे आणि बससेवेला पूरक वाहतूक व्यवस्था म्हणून पॉड टॅक्सीचा विचार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. पॉड टॅक्सी आणि मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणीपूर्वी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या सूचना व आक्षेपांचा विचार केला जाणार आहे.
भविष्यातील अडथळ्यांवर मात करण्याची गरज
ठाण्यातील वाढती वाहतूककोंडी आणि सार्वजनिक वाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेऊन पॉड टॅक्सी प्रकल्पाला पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला. प्रस्तावित अंतर्गत मेट्रोच्या अलाइनमेंटवरून नागरिकांकडून आक्षेप नोंदविण्यात येत असल्याने पॉड टॅक्सी प्रकल्पातही भविष्यात कोणतेही तांत्रिक किंवा स्थानिक अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी सर्व बाबींची सखोल तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ठाण्याची वाहतूक व्यवस्था होणार बहुपर्यायी
ठाणे शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. घोडबंदर रोड, माजिवडा, कापूरबावडी, वागळे इस्टेट आणि पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या मार्गांवर दररोज मोठी वाहतूककोंडी होते. बहुपर्यायी भविष्यात ठाणे शहरात रेल्वे, मेट्रो, बस, पॉड टॅक्सी, जलवाहतूक आणि रस्ते वाहतूक यांचा समन्वय साधून एकात्मिक (Integrated) वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन प्रवासाचा वेळ आणि वाहतूककोंडी दोन्ही कमी करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
गरज लक्षात घेऊन विकासाचे नियोजन
बैठकीत सरनाईक यांनी ठाण्याचा विकास केवळ आजच्या गरजांपुरता मर्यादित न ठेवता पुढील अनेक दशकांतील लोकसंख्या वाढ आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करून नियोजन करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक प्रकल्पात तांत्रिक गुणवत्ता, नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे.
मेट्रो अलाइनमेंटची संयुक्त पाहणी
ठाण्यातील प्रस्तावित मेट्रो अलाइनमेंट आणि रस्ते विकासकामांबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रस्तावित मार्गामुळे विद्यमान संरचनांवर परिणाम होण्याची शक्यता असल्यास तांत्रिक सर्वेक्षणानंतरच अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली.