भिवंडी : मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये मुसळधार पावसाचा जोर सोमवारीही कायम राहिला. त्यामुळे भिवंडी शहरातील सखल भागांमध्ये पाणी भरले. अनेक दुकाने, घरांमध्येही पाणी शिरले होते. तसेच काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
दुसरीकडे पावसाचा जोर वाढल्याने ग्रामीणमधील अनेक गावांना शहराशी जोडणाऱ्या मुख्य भिवंडी पारोळ रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक गावांचा भिवंडी शहराशी संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले.
ग्रामीणमधील चाकरमानी, नोकरदार वर्गाने कामावर जाण्यासाठी सकाळी शहराचा रस्ता धरला. परंतु शहराला जोडण्यासाठीच्या भिवंडी पारोळ या मुख्य रस्त्यावरील कांबे-तळवली गावच्या हद्दीत कमरेपर्यंत पाणी साचल्याने अनेकांना आल्या पायी घरची वाट धरावी लागली.
भिवंडी तालुक्यातील कांबे, जुनांदुरखी, टेंभवली, चिंबिपाडा, लाखिवली, पालिवली, माजिवडा, गडकपाडा, खडकी, कुहे, नांदे अशा अनेक गाव पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला होता. 'कोसळधारे' ने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असून सायंकाळ पर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसत होती.