ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर परिसरात वर्चस्वाच्या वादातून एका तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. विष्णू नायर असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रविवारी पहाटे शास्त्रीनगर नाका परिसरातील ‘एक प्रेमाचा चहा’ या दुकानाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण देवदास इंगळे (३३) हे त्यांचे मित्र विष्णू नायर, अजय सिंग, निलेश यादव आणि बन्सी त्रिपाठी यांच्यासोबत शास्त्रीनगर नाक्यावर उभे होते. त्यावेळी फिर्यादी आणि आरोपी प्रकाश मारुती तिखे उर्फ ‘पक्या’ यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपी प्रकाश तिखे, त्याचा भाऊ विकी तिखे, विकी करोतीया, सिद्धार्थ गौतम रोकडे, गणेश दिवे आणि अन्य दोन अनोळखी इसम असे सात जण पहाटेच्या सुमारास तीन दुचाकींवरून घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या हातात चाकू आणि अन्य धारदार शस्त्रे होती. आरोपींनी विष्णू नायर याला लक्ष्य करत त्याच्यावर हल्ला चढविला. जीव वाचवण्यासाठी विष्णू पळण्याचा प्रयत्न करत असताना तो रस्त्यावर पडला. त्यानंतर मुख्य आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार, विष्णू खाली पडताच आरोपीने त्याच्या छातीवर बसून पोटाच्या डाव्या बाजूस आणि छातीखाली चाकूने वार केले. या हल्ल्यात विष्णू गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मित्रांनी आणि नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तलवार आणि चाकू दाखवत त्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.