उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढत असताना अनेक शहरांमध्ये पाणी कपातही सुरू आहे. अशातच ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने (TMC) गुरुवार, २१ मे दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार, २२ मे दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रावरील तातडीच्या दुरुस्ती आणि अपग्रेडेशन कामांमुळे ठाण्यातील अनेक भागांना या पाणी कपातीचा फटका बसणार आहे. आंध्रा आणि बारवी धरणांमधील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर २३ एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ऑगस्ट २०२६ पर्यंत पाणी व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने ही तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत.
'या' भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
दिवा आणि कळवा : संपूर्ण प्रभाग समिती क्षेत्र
मुंब्रा : बहुतांश भाग (प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील काही भाग वगळता)
वागळे इस्टेट : रूपादेवी पाडा, किसननगर क्रमांक २ आणि नेहरू नगर
मानपाडा : कोलशेत लोअर गाव
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही कमी दाबाची शक्यता
महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवार दुपारनंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही पुढील २४ ते ४८ तास पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता आहे.
नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन
नागरिकांनी आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.