ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीला माजिवडा जंक्शन येथे मोठी गळती लागल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे शनिवार, ११ एप्रिल रोजी सकाळी ९.०० ते रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत ठाणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून वाहतुकीवरही परिणाम होत असल्याने ही दुरुस्ती तातडीने करण्यात येत आहे.
कोपरी कोळीवाडा, पाचगंगा, राबोडी १ व २, चरई, कोळबाद, खोपट, सिव्हिल हॉस्पिटल परिसर. माजिवडा, मानपाडा, ढोकळी, कोलशेत, बाळकूम, लोढा अमारा, कल्पतरू, ब्रह्मांड, रुतु सिटी, हिरानंदानी इस्टेट, कासारवडवली, वाघबीळ, खारेगाव, कलवा, मनीषा नगर, शांतीनगर, मुंब्रा देवी, रेतीबंदर, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, इंदिरानगर, कापूरबावडी, आझादनगर, मानपाडा व आसपासचे परिसर आदी अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
माजिवडा जंक्शन येथील गोल्डन डाईज परिसरातील सेवा रस्ता (Service Road) दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.