ठाणे : गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईतून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या वेगळ्याच समस्येमुळे ठाणे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अनेक भागांमध्ये कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे.
पिसे आणि शहाड येथील जलउद्वहन केंद्रांमध्ये नदीतून वाहून आलेला मोठ्या प्रमाणातील गाळ, झाडांच्या फांद्या आणि कचरा अडकल्याने पंपांच्या पाणी उपशाच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.
जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने जोर धरल्यानंतर धरणांमधील जलसाठा वाढू लागला आणि पाणीटंचाई दूर होण्याची आशा निर्माण झाली. मात्र, मुसळधार पावसामुळे नद्यांमधील पाण्याचा वेग वाढल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ आणि कचरा जलउद्वहन केंद्रांपर्यंत पोहोचला. त्यामुळे पंपांमध्ये गाळ साचून पाणी उपशावर थेट परिणाम झाला आहे.
ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तकनगर, माजिवडा, कोपरी तसेच इतर अनेक परिसरांमध्ये या समस्येची तीव्रता जाणवत आहे.