ठाणे : ठाणे शहरात नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचे भूमिपूजन गुरुवारी भाईंदरपाडा येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. ठाणे महापालिकेतर्फे उभारल्या जाणाऱ्या या उपक्रमाला महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत आणि पात्र महिलांसाठी दरमहा १५०० रुपयांच्या पेन्शन योजनेसह अनेक उपक्रम राबविले आहेत. याच योजनांचा विस्तार म्हणून ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या कार्यरत महिलांसाठी ‘भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय योजना’ अंतर्गत ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा निधी मिळवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःने विशेष पाठपुरावा केल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
या सुविधेमुळे ठाण्यात नोकरी-व्यवसाय करणाऱ्या तसेच बाहेरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि दर्जेदार निवासाची सोय होणार आहे. शहराच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेने ही एक महत्त्वाची पायरी असल्याचे स्थानिक पातळीवर मानले जात आहे. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, माजी नगरसेविका साधना जोशी, विभाग प्रमुख रवी घरत, राजेंद्र पाटील, साजन कासार, कृष्णा भोईर, महिला विभाग प्रमुख रोहिणी ठाकूर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
नऊ मजली अत्याधुनिक वसतिगृह
भाईंदरपाडा-घोडबंदर रोड परिसरात उभारण्यात येणारे हे वसतिगृह नऊ मजली असून आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असेल. यामध्ये वाहन पार्किंग, फूड कोर्ट, मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. १०० खोल्यांच्या या वसतिगृहात ४०० कार्यरत महिलांना सुरक्षित, आरामदायी आणि परवडणारे निवासस्थान एकाच छताखाली मिळणार आहे. पुढील दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
कार्यरत महिलांसाठी सन्माननीय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे आणि हे वसतिगृह त्या दिशेने ठाण्याचा आदर्श प्रयत्न ठरेल. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री