उल्हास नदी (संग्रहित छायाचित्र) 
ठाणे

उल्हास नदीवर अंतर्गत जलवाहतूक विकसित होणार; केंद्राकडे प्रस्ताव सादर

उल्हास नदीवर जलवाहतूक सुधारण्यासाठी केंद्राकडे महत्वाचा प्रस्ताव सादर झाला आहे. या प्रस्तावात नदीचे खोलीकरण (ड्रेजिंग), नौकानयनासाठी योग्य जलमार्ग राखणे, प्रवासी व मालवाहू धक्के उभारणे, दिशादर्शक व सुरक्षात्मक यंत्रणा बसवणे तसेच प्रवासी व मालवाहू फेरी सेवा सुरू करण्याचा समावेश आहे.

Swapnil S

बदलापूर: उल्हास नदीवर अंतर्गत जलवाहतूक मार्ग विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव बदलापूरचे माजी नगराध्यक्ष व भाजप राज्य समिती सदस्य राम पातकर यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाकडे सादर केला आहे. तांत्रिक अहवालांचा आढावा घेतल्यानंतर जलमार्ग प्राधिकरण, ठाणे महानगर पालिका तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकार या प्रस्तावावर निर्णय घेणार असल्याची माहिती पातकर यांनी दिली आहे.

उल्हास नदीला यापूर्वीच राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक ५३ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर राम पातकर यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना उल्हास नदीवर जलवाहतूक सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. वांगणी ते कल्याण–उल्हास खाडीपर्यंत संरचित जलवाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) मंजूर करून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली असल्याचे पातकर यांनी सांगितले.

डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ व परिसरात झपाट्याने होत असलेल्या नागरी विस्तारामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत अंतर्गत जलवाहतूक हा पर्यावरणपूरक, किफायतशीर व शाश्वत पर्याय ठरू शकतो. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन उपनगरातील प्रवाशांना दीर्घकालीन दिलासा मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

या प्रस्तावात, नदीचे खोलीकरण (ड्रेजिंग), नौकानयनासाठी योग्य जलमार्ग राखणे, प्रवासी व मालवाहू धक्के उभारणे, दिशादर्शक व सुरक्षात्मक यंत्रणा बसवणे तसेच प्रवासी व मालवाहू फेरी सेवा सुरू करण्याचा समावेश आहे. सन २०१६ मध्ये राष्ट्रीय जलमार्ग कायद्यान्वये उल्हास नदी राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आली होती. त्या वेळी भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाने प्राथमिक अभ्यास केला होता. मर्यादित मालवाहतुकीच्या शक्यतेमुळे पुढील टप्पे पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता नवीन अभ्यास सुरू असून, ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड या जलमार्गाच्या व्यवहार्यतेचा आढावा घेत आहेत.या प्रकल्पामुळे केवळ विश्वासार्ह वाहतूक पर्याय उपलब्ध होणार नाही, तर आर्थिक विकास, पर्यटनाला चालना व रोजगारनिर्मिती होण्यासही मदत होईल, असा विश्वासही पातकर यांनी व्यक्त केला आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड