उल्हासनगर : मेट्रोच्या श्रेयवादातून सुरू झालेली भाजप-शिवसेनेतील धुसफूस आता असहकाराच्या भूमिकेपर्यंत पोहोचली आहे. आमदार कुमार आयलानी यांच्याविरोधात शिवसेना नेते तथा महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी कथित आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. कमलेश निकम यांनी या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करेपर्यंत त्यांच्या कोणत्याही कामाला भाजपची साथ मिळणार नाही, असा इशारा भाजप नेते प्रदीप रामचंदानी यांनी दिला.
गुरुवारी भाजप जिल्हाध्यक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, उपमहापौर अमर लुंड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी भाजपचे सर्व ३७ नगरसेवक आमदार आयलानी यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे रामचंदानी यांनी स्पष्ट केले.
कमलेश निकम यांच्यावर कंत्राटदारांवर दबाव टाकून पसंतीच्या कंत्राटदारांकडून कामे करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भाजपने केला. तसेच विकासकामांचे श्रेय, डम्पिंग ग्राउंड, जुने टेलिफोन एक्स्चेंज आणि तीन भूखंडांच्या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. महायुतीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वादात हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. कमलेश निकम आणि सभागृह नेते अरुण आशान यांनी कार्यपद्धतीत बदल करून आमदारांबाबतच्या वक्तव्यावर खेद व्यक्त केल्यानंतरच सहकार्याचा विचार केला जाईल, असे भाजपने स्पष्ट केले. त्यामुळे उल्हासनगरातील महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.