अनिलराज रोकडे/वसई
वसई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील हवामान, जमीन आणि भौगोलिक परिस्थिती निर्यातक्षम केळीच्या उत्पादनासाठी अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत वसई आणि पालघर हे ‘चिलिंग फ्री’ केळीचे निर्यात केंद्र म्हणून उदयास येतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय केळी उत्पादन तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी व्यक्त केला आहे. सुख संपत्ती संवर्धन सहकारी संस्था, वसई आणि जैन इरिगेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान परिषदेत’ ते बोलत होते.
वसई आणि पालघर जिल्ह्यांची मुंबई बंदराशी असलेली भौगोलिक जवळीक ही केळी निर्यातीच्या दृष्टीने मोठा फायदा देणारी ठरू शकते. पारंपरिक अग्रस्थान असलेल्या जळगाव व सोलापूर जिल्ह्यांच्या तुलनेत हा भौगोलिक लाभ शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराण, इराक, दुबई, ओमान, सौदी अरेबिया आणि रशिया या देशांमध्ये भारतीय केळीला प्रचंड मागणी असून, या मागणीचा फायदा वसई-पालघर येथील शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. यासाठी केळीची कापणी जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान झाली पाहिजे, तरच ती चिलिंगशिवाय निर्यात केली जाऊ शकते.
या परिषदेत छोट्या शेतकऱ्यांसाठी वेलची, इलायची, रेड बनाना आणि नेंद्रन या जातींची लागवड फायदेशीर ठरू शकते, अशी माहिती सुख संपत्ती संवर्धन संस्थेचे चेअरमन ओनिल आल्मेडा यांनी दिली. मुंबई मार्केटमध्ये या जातींना प्रचंड मागणी असून, भविष्यात शेतकऱ्यांना टिशू कल्चर रोपे पुरवली जातील. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून करार शेतीचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यावर्धिनी ट्रस्टचे अध्यक्ष विकास वर्तक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ फ्रान्सिस डिकोस्टा, जीएससीचे चेअरमन विन्सेंट आल्मेडा, आणि जॉन आल्मेडा प्रतिष्ठानचे ट्रस्टी पॅट्रिक आल्मेडा व्यासपीठावर उपस्थित होते.