उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ मधील डम्पिंग ग्राऊंडवर सातत्याने लागणाऱ्या कचऱ्याच्या आगीने पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षाचे तोंड उघडले आहे. या आगीवर नियंत्रण ठेवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. १५ वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या नितीन गुजर या कर्मचाऱ्याला सुरक्षा साधनांच्या अभावामुळे गंभीर इजा झाली असून, यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित होत आहेत.
उल्हासनगरच्या डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याला सातत्याने आग लागत असते. या आगीमुळे परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण होते. कचऱ्याचा वास, विषारी वायू आणि धगधगती आग यामुळे येथील अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठा धोका पत्करावा लागतो. नुकत्याच घडलेल्या घटनेत, नितीन गुजर या कंत्राटी कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय आगीत होरपळले. गंभीर स्वरूपाच्या या जखमांमुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना आग लागलेल्या कचऱ्यावर पाणी मारताना कोणतीही आधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या १५ वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या नितीन गुजर यांच्यासह इतर सहकऱ्यांना अद्याप महापालिकेच्या सेवेत कायम केलेले नाही. त्यांच्या प्रामाणिक सेवेला योग्य मान्यता न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
या घटनेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्वरित सुरक्षा साधनांची उपलब्धता, नियमित प्रशिक्षण, आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.