

‘बॉर्डर २’मधील ‘घर कब आओगे’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून अभिनेता वरुण धवन सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करत आहे. काही नेटकऱ्यांनी त्याच्या एक्स्प्रेशन्सवर टीका करत खिल्ली उडवली, तर काहींनी थेट त्याच्या अभिनय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेता सुनील शेट्टीने वरुणच्या बाजूने उभे राहत ट्रोल्सना खडेबोल सुनावले आहेत.
"तो स्वतःची नाही, तर...
बॉम्बे टाइम्सशी बोलताना सुनील शेट्टीने यावर प्रतिक्रिया दिली. "बॉर्डर २ चित्रपट कोणी पाहिलाय का? कोणीच चित्रपट पाहिलेला नाही. आपण फक्त त्याची झलक पाहिली आहे. वरुण धवनने या चित्रपटात जबरदस्त काम केले आहे. तो उत्कृष्ट अभिनेता आहे.” पुढे बोलताना, "वरुण स्वतःची नाही, तर देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या एका सन्मानित अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. अशा भूमिकांवर टीका करण्याआधी लोकांनी थोडा विचार करायला हवा. आज कुणावरही टीका करणे आणि त्याला खाली खेचणे फारच सोपे झाले आहे" असे सुनील शेट्टीने म्हटले. उल्लेखनीय म्हणजे सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी देखील या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे.
वरुण धवनचे ट्रोल्सना उत्तर
याआधी, वरुण धवनने इन्स्टाग्रामवर "मेजर होशियार सिंग दहिया" या कॅप्शनसह काही फोटो शेअर केले होते. त्यातील कमेंट सेक्शनमध्येही एका युजरने ट्रोल करण्यासाठी अभिनयावर प्रश्न उपस्थित केल्यावर वरुणने उत्तर दिले, “हाच प्रश्न गाणं हिट करतोय. सगळे एन्जॉय करतायत, रब दी मेहर.”
बॉर्डर २ हा चित्रपट २३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून, यात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.