Dussehra 2025 : दसऱ्याला आपट्याच्या पानांना का मिळतो सोन्याचा मान? वाचा यामागची रोचक कथा

दसरा किंवा विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ सण मानला जातो. या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची परंपरा विशेष महत्त्वाची आहे. पुराणकथांनुसार कौत्स हा पैठण नगरीतल्या...
Dussehra 2025 : दसऱ्याला आपट्याच्या पानांना का मिळतो सोन्याचा मान? वाचा यामागची रोचक कथा
Published on

दसरा किंवा विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ सण मानला जातो. शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर दुसऱ्याच दिवशी हा सण साजरा केला जातो. रामाने रावणाचा वध करून विजय मिळवला याचं प्रतीक म्हणून या दिवशी रावणदहन होतं. तसेच शस्त्रांची, धनाची, ज्ञानाची आणि भक्तीची पूजा करून नवीन कार्यांची सुरुवात केली जाते. या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची परंपरा विशेष महत्त्वाची आहे.

आपट्याच्या पानांच्या सोन्याशी असलेल्या नात्याची आख्यायिका

पुराणकथांनुसार राम, लक्ष्मण आणि त्यांचे वडील राजा दशरथ यांचा पूर्वज म्हणजेच रघुराजा होय. त्याची कीर्ती इतकी विलक्षण होती, की ज्या इक्ष्वाकु कुळात त्याचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखले जाऊ लागले.

संस्कृतमधील महाकवी कालिदासांनी आपल्या रघुवंश या काव्यात रघुराजासह त्याच्या वंशातील राजांची गाथा सुंदररीत्या मांडली आहे. त्यात रघुराजाच्या अप्रतिम दानशूरतेची एक मनोरंजक कथा आढळते. तिचा सारांश असा आहे –

कौत्स हा पैठण नगरीतल्या देवदत्त नावाच्या विद्वानाचा मुलगा. तो वरतंतु ऋषींकडे वेदांचा अभ्यास करत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. पण वरतंतु ऋषींनी “मला काही नको” असं स्पष्ट सांगितलं. तरीही कौत्स गुरूंना काही तरी देण्याचा आग्रह सोडायला तयार नव्हता.

त्याच्या या हट्टामुळे थोडेसे वैतागलेल्या वरतंतुंनी म्हणाले, “तू चौदा विद्या शिकलास ना? मग मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे.” त्यांना वाटलं, इतकं प्रचंड देणं कौत्साला कधीच जमणार नाही आणि तो स्वतःहून आपला आग्रह सोडून देईल. पण कौत्स तसा चतुर आणि निर्धाराने पुढे जाणारा होता.

कौत्स सरळ दानवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रघुराजाकडे गेला. रघुराजानं त्याचं मनापासून स्वागत केलं, हालहवाल विचारला आणि “तुला काय हवं आहे?” अशी विचारणा केली. काहीसा संकोच करत कौत्सानं गुरुदक्षिणेची आपली अडचण सांगितली, ते ऐकून राजा मात्र गोंधळून गेला.

कारण नुकतंच रघुराजानं संपूर्ण पृथ्वी जिंकल्यानंतर विश्वजीत यज्ञ केला होता आणि त्या यज्ञानंतर आपली संपूर्ण संपत्ती दान करून टाकली होती. इतकंच नव्हे, तर तो स्वतः साध्या झोपडीत राहू लागला होता आणि मातीची भांडी वापरत होता. तरीही कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यानं तीन दिवसांची मुदत मागितली आणि धनसंपत्तीच्या अधिपती कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं.

रघुराजाचा हा इरादा कळताच युद्ध टाळण्यासाठी कुबेरानं सुवर्णमुद्रांचा अक्षरशः पाऊस पाडला. पाहता पाहता रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला. त्यानं कौत्साला संपूर्ण सोनं दान करायला तयार होताच, पण कौत्सानं फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि त्या गुरू वरतंतुंना अर्पण केल्या. गुरूंनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला.

कुबेरानंही एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला. मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौत्सानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. तो दसऱ्याचा दिवस होता.

या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली.

Dussehra 2025 : दसऱ्याला आपट्याच्या पानांना का मिळतो सोन्याचा मान? वाचा यामागची रोचक कथा
Dussehra 2025 : विजयादशमीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या तिथी, योग, शस्त्रपूजन मुहूर्त आणि महत्त्व

परंपरेमागचा संदेश

दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पानं देत “सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा” असा शुभेच्छा संदेश देतात. हे पान केवळ सुवर्णाचं प्रतीक नसून समृद्धी, ज्ञान आणि सद्भावनेचं प्रतीक मानलं जातं.

आजची प्रथा

आजही विजयादशमीला घराघरात आपट्याची पानं देवपूजेत अर्पण केली जातात आणि नंतर नातेवाईक व मित्रमैत्रिणींमध्ये वाटली जातात. या परंपरेतून संपत्तीइतकंच सद्गुण आणि स्नेह जपण्याचा सुंदर संदेश दिला जातो.

logo
marathi.freepressjournal.in